मुंबई | राज ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन दहीहंडीसह सण उत्सव साजरा करण्याबाबत भूमिका मांडली होती. सर्व गोष्टी सुरू आहेत. यांचे मेळावे सुरू आहेत. राणेंची यात्रा निघाली. त्यांच्यासोबत हाणामाऱ्या सुरू आहेत. भास्कर जाधवच्या मुलाने अभिषेक सुरू केला अशी टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली होती आता राज ठाकरे यांच्या टीकेला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.लोकांच्या जीवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नका, असा टोला दिलीप वळसे-पाटील यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. सर्व जगात कोरोनाची परिस्थिती बिकट आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली आहे. ही लाट आली तर त्याचा परिणाम मोठा होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण राज्याला त्याचा तोटा होऊ शकतो. त्यामुळे राजकीय पक्षांनी लोकांच्या जीवापेक्षा स्वत:चा राजकीय अजेंडा महत्त्वाचा मानू नये, असं आवाहन वळसे-पाटील यांनी केलं.
पुढे बोलताना वळसे पाटील म्हणाले की, सहकार कायद्याने काय परिणाम होणार? याबाबत आज चर्चा झाली. सहकार कायद्याने होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी एक विचार गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाचा अहवाल आल्यानंतर कॅबिनेटमध्ये चर्चा होईल, असं ते म्हणाले. आता गृहमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला मनसे काय उत्तर देते हे पाहावे लागणार आहे.