मुंबई | ठाकरे सरकारने किराणा माल आणि सुपर मार्केच्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर विरोधकांकडून राज्य सरकावर टीका केली जाऊ लागली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला.
आता त्या पाठोपाठ जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुद्धा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सरकारने नुकताच सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले की, एकीकडे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचे सांगत आहे. तर वाईन म्हणजे दारू नाही असेही सांगण्यात येतंय. मात्र, असे निर्णय ह्या राज्याला कुठे घेऊन जाणार हा खरा प्रश्न आहे, अशा शब्दात अण्णांनी राज्य सरकारच्या वाईन विक्री निर्णयावर जोरदार टीका केली आहे.
वास्तविक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. असे असताना केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय घेण्यात येत असल्याचे पाहून दुःख होते असे विधान त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर केले होते.