कोल्हापूर | कोल्हापुरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज कोल्हापुरात एक दिवशीय दौरा केला होता. यावेळी अजित पवार आणि राजेश टोपे यांनी आरोग्य तंत्रणेसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. हे बैठक सम्पल्यानंतर अजित पवारांनी आयोजित पत्रकार परिषदेत कोल्हापूरकरांना कळकळीचे आव्हान केले आहे.
आजच्या परिस्थितीला कोल्हापुरात पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे. राज्यात सर्वात जास्त रुग्णवाढ कोल्हापुरात होत आहे. त्यामुळे कोल्हापुरात निर्बंध कमी करण्याचा अजिबात विचार नाही, उलट ते अधिक कडक केले जातील. आम्हाला निर्बंध लादण्यात हौस नाही, थोडं सोसा, कोल्हापुरात निर्बंध अधिक कडक करणार. बऱ्याच लोकांच्या तोंडावर मास्क नाही, रुमाल लावतात, पोलीस आले की रुमाल वर करतात. असं करु नका, तुम्हाला कोरोना झाला की बाकीच्या निष्पाप लोकांना त्याचा फटका बसतो. निर्बंध कडक अंमलबजावणी व्हायला हवी असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ठणकावून सांगितलं आहे.
तसेच कोल्हापुरातील १२ जिल्ह्यात जिथे लसीकरण झालंय, तिथे पॉझिटिव्हिटी रेट थोडा कमी आहे. त्यामुळे लसीकरणावर भर असेल. जशी लस उपलब्ध होईल, तशी ती उपलब्ध करुन दिली जाईल, असं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच गृह विलगीकरण बंद करून संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याची गरज आहे. तिसऱ्या लाटेची तयारी केली आहे. टेस्टिंगचं प्रमाण वाढवलं पाहिजे, टेस्टिंग वाढवल्यावर रुग्ण संख्या वाढलेली दिसेल, पण हरकत नाही, मात्र त्यामुळे ट्रेसिंग होऊन उपचार करणं सोपं होईल, असं अजित पवार म्हणाले.