‘आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. आता त्यांच्या या टीकेला काँग्रेस नेते आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जोरदार टोला लगावला आहे.
राऊत म्हणाले, ‘काँग्रेस पक्षावर अनेकवेळा अशी स्थिती आली. त्यातून हा पक्ष बाहेर पडला आणि पुन्हा उभा राहिला. आताही पक्ष प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे पवारांनी काँग्रेसची चिंता करू नये. दुसऱ्यांकडे बोट दाखविताना स्वत:च्या पक्षाचा विचार करावा, असा टोला नितीन राऊत यांनी थेट पवारांना लगावला होता.
पवार हे आमच्यासाठी आदरणीय नेते आहेत. ते महाराष्ट्रात सत्तेत आमचे सहकारी आहेत. मात्र एका मित्र पक्षाबद्दल, ते अशी टीका करणार असतील, तर त्याचा आम्ही निषेध करतो. अशी टीका सहन केली जाणार नाही. पवार यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला असला, तरी त्यांना राज्यात त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री करता आलेला नाही. ममता बॅनर्जी, मायावती यांनी त्यांच्या राज्यात त्यांच्या पक्षाची स्वबळावर सत्ता आणली. त्या मुख्यमंत्री बनल्या. पण पवार तसे करू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी काँग्रेसवर टीका करू नये, असे नितीन राऊत म्हणाले आहेत.