मुंबई | पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आता नवीन नवीन खुलासे होत आहेत. सक्तवसुली संचनालय अर्थात ईडीने आरोप पत्र दाखल केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभागाची कालबद्ध मर्यादेत चौकशी करावी अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
अतुल भातखळकर यांनी ही मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहाता हे प्रकरण फक्त संजय राऊत यांना झेपणारे आहे असे सुरुवातीपासून वाटत नव्हते, असेही भातखळकरांनी म्हटलं आहे. या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या शिवसेनेबरोबर असलेल्या संबंधांची चौकशी व्हावी
मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरु आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे याकरिता तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली. या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळं मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी पत्र पाठवून केली आहे.