जत तालुक्यातील मोरबगी लवंगा या ठिकाणी पालघर साधू हत्याकांडासारखी घटना घडली आहे. मुले पळवणारी चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर आता या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादी काँग्रेसने नव्या शिंदे-भाजप सरकारवर यावरून निशाणा साधला आहे. हिंदुत्वासाठी सरकार सोडले, पण राज्यात साधू सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. यानंतर आता भाजपाने याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपाने यावरून जयंत पाटलांना खोचक टोला लगावला आहे. “पालघर साधू हत्याकांडाच्या वेळी बहुदा जयंत पाटील अंतराळात फिरायला गेले होते” असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “हिंदुत्ववादी म्हणून सत्तेत आलेल्या शिंदे आणि भाजपाच्या राज्य सरकारच्या काळात साधू सुरक्षित नाहीत. साधूंना मारहाण करणे अयोग्य असून मारहाण करणे चुकीचे आहे इति जयंत पाटील. पालघर साधू हत्याकांडाच्या वेळी बहुदा जयंत पाटील अंतराळात फिरायला गेले होते. त्यांना ती घटना माहितीच नसावी” असं भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
साधूंच्या हिंदुत्वासाठी सरकार सोडले आणि साधूच या राज्यात सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशा शब्दात जयंत पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल आहे. तसेच साधूंना मारहाण करणे हा प्रकार योग्य नसून, अशा प्रकारे साधूंना मारहाण करणे चुकीचे आहे, असे जयंत पाटील यांनी म्हणाले. ते सांगलीत बोलत होते. यावरून भाजपाने हल्लाबोल केला आहे.