अभिनेत्री कंगना रानौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यातील ई-मेलची आता मुंबई पोलिसांचे गुन्हेगारी गुप्तवार्ता पथक नव्याने चौकशी करणार असून लवकरच हृतिक रोशन याचा मुंबई पोलीस जबाब नोंदवणार आहे. त्यामुळे २०१६ साली थांबलेला तपास पुन्हा एकदा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणी अधिक वाढताना दिसून येणार आहे.
कंगनाने हृतिकवर काही रोमँटिक आणि खाजगी ई-मेल पाठवल्याचा आरोप केला होता. या आरोपामुळे या दोघांमध्ये वाद पेटला होता. त्यात हृतिकने कंगनाने लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते.
त्यानंतर या दोघांमधील वाद पोलिसांपर्यंत गेला. कंगनानेच आपल्याला हजारो मेल पाठविल्याचा आरोप करीत हृतिकने पोलिसांत तक्रार केली होती. त्याच्या तक्रारीवरून सन २०१६ मध्ये वांद्रे-कुर्ला संकुल येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र कंगनाने याबाबत आपणास काही माहित नसून बोगस आयडीवरून मेल पाठविण्यात आले असावेत, असे म्हटले होते. तपासाकरिता हृतिकने मोबाइल, लॅपटॉप तसेच इतर साहित्य पोलिसांना दिले होते. चार वर्षांनंतरही या गुन्ह्याचा तपास थांबला होता. मात्र अनेक वर्षांपासून रखडलेल्या या गुन्ह्याच्या तपासामध्ये लक्ष देऊन तो लवकरात लवकर संपवावा, अशी मागणी महेश जेठमलानी यांनी पत्राद्वारे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा या तपासाला गती मिळाली आहे.