मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्यांबाबत मोठी भूमिका मांडली होती. १ मे रोजी त्यांनी औरंगाबादेत सभा घेत पुन्हा एकदा राज्य सरकारला भोंगे उतरवण्याबाबत अल्टीमेटम दिला आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही बाबरी मशिदीचा मुद्दा पुन्हा एकदा उकरून काढला. यावरून राज्यातील वातावरण चांगलेच रंगले आहे.
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सूचक ट्वीट करत विरोधकांवर निशाणा साधला. “निकले हैं वो लोग हमारी शख्सियत बिगाड़ने जिनके खुद के किरदार मरम्मत मांग रहे हैं”, असे ट्वीट राऊत यांनी केले आहे. राज्यातील मविआ नेत्यांवरील ईडीच्या कारवाया, भाजपकडून केले जाणारे आरोप यामुळे मविआ सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. त्यातच धार्मिक तेढ निर्माण करून राज्यातील वातावरण विरोधक बिघडवत असल्याचा आरोप मविआ नेत्यांकडून केला जात आहे.
दरम्यान आज राज ठाकरेंनी दिलेली मुदत संपणार आहे. आता राज्य सरकार भोंग्याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे ४ तारखेनंतर अजिबात ऐकणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध विरोधक असा सामना रंगलेला पाहायला मिळणार आहे.