राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधात सतत महाविकास आघाडीवर टीका करताना दिसून येत आहेत अशातच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जवळीक विरोधात बसलेल्या भाजपाला खटकताना अनेकदा दिसून आले आहेत. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीका केली. राष्ट्रवादीने महत्वाचे खाते स्वतःकडे ठेवले आणि मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे दिले, अशी टीका पाटील यांनी केली.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पाटील यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. ‘राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जुळत असल्याने ते भाजपला पचत नाही. त्यामुळे भाजपचे लोक आशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत, अशी टीका मलिक यांनी नाव न घेता चंद्रकांत पाटलांवर केली आहे.
नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी सांगत आहेत की सत्तेचा दुरुपयोग करून निवडणूक लढवण्यात आली. म्हणजे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर ते प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. फडणवीस यांच्या आरोपांना कोणतेही तथ्य नाही. सध्याच्या नगरपंचायत निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर आता भाजप नेते काहीच बोलत नाहीत.