महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमाप्रश्न पेटला असताना, त्यावर तोडगा काढण्याचे काम आता केंद्र सरकार करत आहे. सीमावर्ती भागातील मराठी भाषकांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यासंदर्भात आपण स्वत: हस्तक्षेप करू, तसेच दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांना दिले. मात्र यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत गृहमंत्र्यांना भेटून काहीही फरक पडणार नसल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही. कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नाबाबत मी कर्नाटकच्या खासदारांना सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी कळवलं आहे. राज्याची कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी मी लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांनाही भेटणार आहे, असं बसवराज बोम्मई यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
बसवराज बोम्मईंच्या या ट्विटवर शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक बोम्मई पाहिले आहेत, ते त्यांना सरळ केल्याशिवाय राहणार नाहीत अशी खात्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे यावरून त्यांची भूमिका स्पष्ट होते. आम्ही राज्यात एकत्र आहोत, आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आणि आमची अस्मिता एकच आहे, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.