मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर अवघ्या काही महिन्यातच महाराष्ट्रात काँग्रेस मजबूत करण्यासाठी पक्ष नेतृत्वांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी नाना पटोले यांची नियुक्ती केली होती. तसेच नियुक्ती झाल्यावर पटोले यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका करत थेट येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला स्वबळाचा नारा दिला होता. मात्र पटोले यांच्याकडून सातत्याने मोदींवर करण्यात येणाऱ्या टीकेला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे घोषित केले होते. त्यानंतर आता अन्य पक्षांकडूनही भूमिका मांडल्या जात असून, संमिश्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. यातच आता भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी नाना पटोले आणि राहुल गांधी यांना टोला लगावला आहे.
नाना पाटोलेंना मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय…
राहुलजींनाही वाटतंय पंतप्रधान व्हावसं…
जनतेला असं अजिबातच वाटत नाही, भविष्यात वाटण्याची शक्यताही नाही हाच दोघांचा प्रॉब्लेम आहे.@RahulGandhi@NANA_PATOLE
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 13, 2021
नाना पाटोलेंना मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय. राहुलजींनाही वाटतंय पंतप्रधान व्हावसं. जनतेला असं अजिबातच वाटत नाही. भविष्यात वाटण्याची शक्यताही नाही हाच दोघांचा प्रॉब्लेम आहे, या शब्दांत अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून चिमटा काढला आहे. आता भातखळकर यांनी केलेल्या टीकेला पटोले काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.