पुणे | महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील वाढ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. मागच्या काही दिवसांपासून स्वबळाचा नारा देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांसमोर खदखद व्यक्त केली. लोणावळा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
तसेच पुण्याच्या पालकमंत्रीपदी काँग्रेसचा व्यक्ती बसवण्याची शपथ घ्या, असे आवाहन पटोले यांनी कार्यकर्त्यांना केले. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, मी जे बोललो त्यात माघार घेणारच नाही. स्वबळावरच निवडणूक लढवणार. त्यामुळे आपण कामाला लागा. मी माध्यमांशी बोलताना म्हणालो की, मुख्यमंत्र्यांनी काल शिवसैनिकांना कामाला लागण्यास सांगितले. मग मी बोललो होतो तर त्रास होत होता, ते बोलले तर ठीक आहे असा चिमटा पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना काढला.
कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना नाना पटोले यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा
साधला. आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची काम करतात. आपल्या लोकांची
कामं करतात का ? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की
नाही ते त्यांनी ठरवायचं… कारण त्यांची सही लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही, असा टोला
त्यांनी अजित पवारांना लगावला.