आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट युतीने १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले असून, आगामी महापौर हा भाजपचाच असेल, असा ठाम विश्वास मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी मंगळवारी व्यक्त केला. ठाकरेंच्या ‘किंचित’ शिवसेनेपेक्षा शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाची कामगिरी चांगली असेल, असे भाकीतही त्यांनी केले. ‘लोकसत्ता’च्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात शेलार बोलत होते.
शेलार म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या काळात शिवसेनेचे वर्तन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेनेचे वर्तन यात मोठा फरक असल्याचा भाजपचा अनुभव आहे. बाळासाहेब ठाकरे दिलदार होते, त्यांच्याशी संवाद होत होता आणि हिंदुत्वासाठी आमची युती होती. उद्धव ठाकरे हे अहंकारी असून ‘भाजपबरोबर युतीत शिवसेना २५ वर्षे सडली’, असे ते म्हणाले होते.
उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत २०१७ मध्ये आणि विधानसभा निवडणुकीत २०१४ मध्ये एका जागेसाठी युती तोडली. २०१९ मध्ये पुन्हा त्यांनी भाजपशी युती केली. मोदी यांच्या छायाचित्राचा वापर करूनच शिवसेनेने मते मिळविली होती, याचा त्यांना बहुधा विसर पडला असावा. त्यांच्या वागण्या -बोलण्यात काहीच तारतम्य नसते. ’’ अशी टीकाही शेलार यांनी केली.