पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकास कामांच्या उदघाटनासाठी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांच्या प्रमुख उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर स्तुतीसुमणं उधळली. ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत टीका केली आहे.
रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हंटलय, काल मुंबईतील कार्यक्रम पाहून हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय! मला तर वाटतं या कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल!मात्र, २०१६ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील भव्य स्मारकाच्या भूमीपूजनासाठी आणलेल्या गड-किल्ल्यांवरील पवित्र मातीने नक्कीच मूक अश्रू ढाळले असतील, आणि अरबी समुद्रातील त्या खडकानेही आश्चर्याने कान टवकारले असतील! असा खोचक ट्विट करत रोहित पवार यांनी टोले लगावले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यामध्ये नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा मुद्दा पुन्हा उपस्थित करून भाजपला चिमटा काढला आहे.खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून अरबी समुद्रातील स्मारकाच्या संदर्भात भाजपवर निशाणा साधला जात आहे, स्वतः नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करूनही भाजपने स्मारक पूर्ण न केल्याने विरोधक त्यावरून टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.
काल मुंबईतील कार्यक्रम पाहून हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय! मला तर वाटतं या कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल! pic.twitter.com/NXuCGmQcQb
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 20, 2023