मुंबई वाढत्या लोकसंख्या बरोबर वाढत्या वाहनाच्या संख्यांमुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता मोडकळीच्या परीस्थितीत आलेल्या आणि धोकादायक झालेल्या उड्डाणपुलांमुळे सध्या मुंबईत मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. यावर उतारा म्हणून लवकरच मुंबई महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पातंर्गत मुंबईत केबल आधारित १२ पूल उभारण्यात येणार असून त्यासाठी 1775 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मुंबईच्या वाहतूककोंडीची समस्या सोडवणारे १७७५ कोटींचे १२ केबल ब्रिज पालिका बांधणार आहे. २०२४-२५ पर्यंत या पुलांचे काम पूर्ण होणार आहे. संबंधित ब्रिटिशकालीन पूल बांधून १०० ते १२७ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली. या पुलांसाठी पालिका खर्च करणार असून पुलांचे बांधकाम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि रेल्वेकडून करण्यात येणार आहे.
१४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर पालिकेने मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून जीर्ण पूल पाडून नव्याने बांधणे आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये कमी वेळेत बांधकाम होणारे आणि पर्यावरणपूरक केबल ब्रीज बांधण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आगामी चार वर्षांत कामे पूर्ण करण्यात येतील असा विश्वासही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्यक्त केला.