तृणमूल काँग्रेस अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून मंगळवारी त्यांनी सिव्हिल सोसायटी सदस्यांशी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्यासहित शत्रुघ्न सिन्हा, महेश भट, मेधा पाटकर, तुषार गांधी असे कला, सामाजिक तसंच वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.
ममता बॅनर्जी यांनी यावेळी सर्वांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. दरम्यान यावेळी त्यांनी आर्यन खान प्रकरणावरुन भाजपावर जोरदार टीका केला. शाहरुख खानचा राजकीय बळी देण्यात आला अशी टीका करताना ममता बॅनर्जी यांनी भाजपाला क्रूर आणि अलोकतांत्रिक पक्ष असल्याचं म्हटलं.
त्या पुढे म्हणाल्या की, “महेशजी (चित्रपट दिग्दर्शक महेश भट) तुम्हाला लक्ष्य करण्यात आलं होतं, शाहरुख खानलाही त्रास देण्यात आला. जर आपल्याला जिंकायचं असेल तर आपल्याला लढलं आणि बोललं पाहिजे. तुम्ही आम्हाला राजकीय पक्ष म्हणून मार्गदर्शन करा आणि सल्ला द्या,” असं ममता बॅनर्जींनी यावेळी म्हटलं.