मुंबईत रविवारी १८ जुलै पहाटे झालेल्या मुसळधार पावसात चेंबुर, विक्रोळी व भांडुप या ठिकाणी दरड कोसळून ३२ निरपराध नागरिकांचा बळी गेला. शहरात अश्या घटना वारंवार घडत असून महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे ही बाब अत्यंत दुख:द, वेदनादायी व क्लेशकारक असून मुंबई महानगरपालिका प्रशासनाला भूषणावह नसल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत कोणतेही कामकाज न करता सभा तहकुब करण्यात यावी असा प्रस्ताव मांडला.
परंतु शिवसेनेने श्रेयवादाची लढाई करत सदर सभा तहकुबी विचारात न घेता या विषयावर कोणतीही चर्चा न करता सभागृहाच्या कामकाजाच्या प्रथा परंपरेचे उल्लंघन करून श्रद्धांजलीचा प्रस्ताव सभागृह नेत्यानी मांडण्याची परंपरा धुडकावून स्वतः थेट अध्यक्षांनी फक्त श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावरही कोणतीही चर्चा न करता श्रद्धांजली वाहून सभा तहकूब केली. खरे पाहता दरड कोसळीचे प्रकार वारंवार घडून जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी नगरसेवकांचे मत, विचार व सूचना आणि प्रशासनाची भूमिका यावर साधकबाधक चर्चा होणे अपेक्षित होते. पण मुर्दाड प्रशासन आणि असंवेदनशील सत्ताधारी शिवसेनेने चर्चेपासून पळ काढला.
मुंबईत रविवारी १८ जुलै पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे चेंबुर, विक्रोळी व भांडुप या ठिकाणी झालेल्या अपघातांमुळे मोठी जीवित हानी झाली. भविष्यात अशा घटना घडू नयेत याकरिता महापालिका प्रशासन ज्याप्रमाणे जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचे सर्वेक्षण करते त्याच धर्तीवर दाट लोकवस्ती असलेल्या डोंगराळ भागातील संरक्षक भिंतींचे महापालिकेमार्फत तातडीने सर्वेक्षण करुन तेथील असुरक्षित व धोकादायक भागातील लोकांचे स्थलांतर करणे आवश्यक आहे. जेणेकरुन जीवित तसेच वित्त हानी टाळता येईल. तसेच या सर्व ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडून तातडीने आवश्यक निधीची उपलब्धता करणे आवश्यक असल्याचे मत गटनेते श्री. शिंदे यांनी व्यक्त केले.