कोरोनाच्या दुसरी लाटेने देशभरात हाहाकार माजवायला सुरवात केली आहे. त्यात रुग्णसंख्या झपाटयाने वाढून मृत्यूचे प्रमाणही काही अंशतः वाढताना दिसून येत आहे, त्यातच वाढत्या कोरोनाचा धोका मुंबईत मोठ्या प्रमाणात जाणवू लागला होता. मात्र आता मुंबई कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. शहरात कोरोना चाचणीच्या पॉझिटिव्हिटीचा दर १० टक्क्यांहून खाली आला आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ही दिलासादायक बातमी दिली आहे.
मुंबईतील पॉझिटिव्हिटी दर २९ एप्रिल रोजी ९.९४ टक्के एवढा होता. गुरुवारी तब्बल ४३,५२५ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील ४ हजार ३२८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जवळपास ४४ हजार चाचण्या केल्यानंतरही शहरातील कोरोनाबाधितांचा दर १० टक्क्यांपेक्षा कमी आढळल्याचे इक्बालसिंह चहल म्हणाले. पालिका आयुक्त मुंबई शहरात नव्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचं सांगत म्हणाले की, तब्बल ८५ टक्के रुग्ण लक्षणंविरहीत असल्यामुळे शहरात उपलब्ध असणाऱ्या बेड्सची संख्या वाढली असून ती आता ५ हजार ७२५ एवढी झाली आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शहरात कोरोना चाचण्यांचा पॉझिटिव्ही दर २०.२५ टक्के होता, तर ४ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांच्या तुलनेत उच्चांकी २७.९४ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. हा दर मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे सध्यातरी दिलासा व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आद्यपही धोका टळलेला नाही त्यामुळे कोरोना संसर्ग संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्यात यावे असे आव्हान त्यांनी केले आहे,