समाजवाजी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एका सभेत मोहम्मद अली जिना यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे वाद झाला होता. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी जिनांबाबत केलेल्या विधानामुळे तो वाद आणखी चिघळण्याची सहायता वर्तवली जात आहे. जर मोहम्मद अली जिना यांना देशाचे पहिले पंतप्रधान बनवले असते तर देशाची फाळणी झाली नसती, असा दावा ओमप्रकाश राजभर यांनी केला आहे. यानंतर आता जदयुचे आमदार खालिद अन्वर यांनी देखील जिनांबाबत विधान केलं आहे. “मोहम्मद अली जिना हे महान स्वातंत्र्य सेनानी होते” असं म्हटलं आहे.
खालिद अन्वर यांनी “मोहम्मद अली जिना हे भारताचे एक महान स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांना पाकिस्तानबद्दल आदर होता. ते एक मोठे नेते होते यामध्ये अजिबात शंका नाही. देशाच्या फाळणीला ते जबाबदार होतेच, पण त्यांच्याइतकेच भारताचे पहिले पंतप्रधान झालेले पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसदेखील फाळणीला जबाबदार होते” असं म्हटलं आहे.
तसेच “काँग्रेसच्या फूट पाडा आणि राज्य करा या राजकारणामुळेच देशाची फाळणी झाली. काँग्रेस करत असलेल्या राजकारणाचा हा खरा चेहरा आहे. आणि त्याच प्रकारचं राजकारण काँग्रेस खेळत आली आहे” असं देखील अन्वर यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी “देशाच्या फाळणीला काँग्रेस आणि त्यावेळचे नेतेच जबाबदार” असल्याचं म्हटलं आहे.