नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समवेत आज खासदारांची बैठक संपन्न झाली. यामध्ये विविध राज्यातील सर्वच भाजप खासदार उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्रातील भाजपचे 26 खासदार उपस्थित होते. दरम्यान पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत खासदारांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल कोणतीही चर्चा केली नसल्याची माहिती समोर आली आहे. आज महाराष्ट्र,कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील खासदारांची बैठक पार पडली.
यामध्ये शिवरायांच्या अपमानाविषयी आणि महाराष्ट्र -कर्नाटक सीमाभागाविषयी चर्चा होणे अपेक्षित होते परंतु चर्चा झाली नसल्याने याबाबत महाराष्ट्राच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींसमोर का मौन पाळलं यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले, राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर, राज्यसभा खासदार आणि मंत्री पियुष गोयल, राज्यसभा खासदार अनिल बोंडे उपस्थित होते.
या बैठकीत महाराष्ट्रातील खासदारांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या भगतसिंह केश्यारी यांना हटवण्याची कोणतीही मागणी या खासदारांनी केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला होता. त्यामुळे त्यांना हटवण्यासाठी 23 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं. शिवाजी महाराजांचा राज्यपालांनी अवमान केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना तीव्र असून राज्यात ठिकठिकाणी निदर्शने होत आहे, असं त्या पत्रात नमूद केलं होतं, अशी माहिती उदयनराजे यांनी दिली.