सध्या संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. तसेच दुसरीकडे रुग्णसंख्या सुद्धा वाढलेली आहे. आज अनेकांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे. अशा कठीण परिस्थितीतही पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदी सरकारला पाकीट मार’ची उपमा दिलेली आहे.
पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढवून मोदी सरकार जनतेचे खिसे कापण्याचे काम करत आहे. हे सरकार पाकिटमार सरकार बनलेय का? असा प्रश्न मलिक यांनी उपस्थित केला आहे . तसेच देशात कोरोनाचे संकट असताना अशाप्रकारे डिझेल-पेट्रोलच्या किंमती वाढवून लोकांची लूट थांबवावी अशी मागणी देखील मलिक यांनी केली आहे.
देशात डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पेट्रोल काही दिवसांत शंभरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. जगात दर कमी असताना भारतात किंमती कशा वाढवल्या जातात, असा सवाल देखील नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला केला आहे. काही दिवसांपूर्वी याच मुद्द्यावर आमदार रोहित पवारांनी भाष्य केले होते. तसेच निवडणुकी नंतर पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील त्यांचे हे भाकीत खरे ठरले होते.