मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंह यांना रोखावं अन्यथा संत, नागासाधू यांचा सामना करावा लागेल असं थेट पत्र कांचनगिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं आहे. राजकीय लढाई करायची असेल तर जरूर करा, पण देवदर्शनासाठी जर कुणाला अडवत असाल तर याद राखा. सर्व साधू संतांचा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा आहे असं गुरु माँ कांचनगिरी यांनी सांगितले.
कांचनगिरी म्हणाल्या की, राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलला. राज ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरेंची छबी दिसते. पूर्ण महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी त्यांनी काम केले. बृजभूषण सिंह यांनी स्वत:कडे पाहावं. ज्यांचे हात रक्ताने माखले आहेत. त्यांनी इतरांना शिकवू नये.
उगाच राजकीय पब्लिसिटीसाठी ते चमकोगिरी करत आहेत. बृजभूषण यांनी त्यांचा इतिहास बाहेर काढण्यासारखी वेळ आणू नये. तुम्हाला उत्तर प्रदेशातील नागरिकांची दया असती तर कंपनी, फॅक्टरी लावून यूपीतील लोकांना सक्षम बनवलं असतं. राज ठाकरे ५ तारखेला येतील कोण अडवतं ते पाहूच असा इशारा त्यांनी दिला.
तसेच मी एकटीने लालचौकात तिरंगा ध्वज फडकवला होता. बृजभूषण सिंह यांच्या पत्रकार परिषदेत एकटीच भिडली. त्यांचे लोक मला रागाने बघत होते. हे संताचा सन्मान करू शकत नाही. राज ठाकरेंना रोखण्याचा प्रयत्न करू नका. प्रभू राम सगळ्यांचे आहेत. कुण्या एकट्याचे नाही. देवदर्शनासाठी हिंदूंनी यायचं नाही तर मुघलांनी यायचं का? असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला होता.