पुणे | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना आज खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी खासदार छत्रपती उदयनराजे यांची भेट घेतली होती. यावेळी बैठक संपल्यानंतर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्रकार माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी ते म्हणाले की, दोन्ही छत्रपती घराण्याने समाजाला नेहमीच दिशा दिली आहे. दिशाभूल करणं, संभ्रम निर्माण करणं आमच्या रक्तात नाही, असं खासदार उदयनराजे भोसलें यांनी बोलून दाखविले होते. तसंच आमच्यात कोणतंही दुमत नाही. आम्ही नेहमीच एकत्रित काम करत आलो आहोत असे सुद्धा त्यांनी बोलून दाखविले होते.
संभाजी छत्रपती यांनी आज उदयनराजे भोसले यांच्याशी मराठा आरक्षणावर २५ मिनिटे चर्चा केली. त्यानंतर दोन्ही राजेंनी मीडियाशी संवाद साधून मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ३३८ बी नुसार आयोग स्थापन करावं लागेल. मराठा समाज हा सामाजिक मागास असल्याचं सिद्ध करावं लागेल. हा अहवाल राज्यपालांना पाठवावा लागेल. राज्यपाल राष्ट्रपतींना पाठवतील, मग तो केंद्रीय मागास आयोगाकडे जाईल. त्यांना वाटल्यास ते आरक्षण देतील. आरक्षण मिळण्यासाठीचे मी दोन चार पर्याय दिले आहेत. त्यामुळे कोणत्या मार्गाने जायचं हे राज्यकर्त्यानेच ठरवावं, असं संभाजी छत्रपती म्हणाले.
तसेच येत्या १६ जून रोजी कोल्हापूरमध्ये मूक आंदोलन होणार आहे. आम्हाला ३६ जिल्ह्यात जायचं नाही. आता त्यावर तुम्हीच मार्ग काढा. आम्ही सहा मागण्या दिल्या आहेत. त्या मान्य करा. तुमचं स्वागत करू, असं सांगतानाच मराठा आरक्षणावर समाज बोलला, आम्ही बोललो. आता लोक प्रतिनिधींनी बोलायला हवं, असं ते म्हणाले. अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.