कोल्हापूर | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने आघाडी सरकार विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यात शनिवारी भाजपाने आघाडी सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले होते. आता या आंदोलनावरून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे. फडणवीसांच्या काळात ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ झाला, असा आरोप मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज करत भाजपाचा समाचार घेतला.
‘जातनिहाय जनगणनेची माहिती केंद्र सरकारने दिली नाही. त्यामुळेच ओबीसी आरक्षण मिळाले नाही. युती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीसांना हे करता आले असते. पण त्यांनी एकमेकांकडे बोटे दाखवली. खरी माहिती समाजापुढे येण्यासाठी याची श्वेतपत्रिका काढावी. याची मागणी राज्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे’, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
‘माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा ईडीने छापा टाकला. त्यावर बोलताना ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी तपास यंत्रणा आणि फडणवीसांवर हल्लाबोल केला. ‘एनआयएचा तपास पंचवार्षिक आहे का? पंचवार्षिक योजनेसारखा का तपास केला जातो? याचा छडा लवकरात लवकर लावावा. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत’, असा आरोप मुश्रीफ यांनी केला.