महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचे लक्ष लागलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पहिल्यांदाच फूट पडली असून दोन मेळावे होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपली क्षमता दाखवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच नियोजन ठाकरेंकडून करण्यात येत आहे.
मात्र या दोन्ही दसरा मेळ्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यंदा शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गट असा दोघांचाही वेगवेगळा दसरा मेळावा होणार आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, की मी दोन्ही दसरा मेळावा भाषणं पाहणार नाही. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे. मी दोन्ही दसरा मेळावा भाषणं पाहणार नाही.
त्यावेळी मी नागपुरात धम्म चक्र परिवर्तन कार्यक्रमात सहभागी होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, की दोन्ही दसरा मेळावा अत्यंत व्यवस्थित पार पडतील. कायदा आणि सुव्यवस्थेचं कठोर पालन केलं जाईल. मात्र, सध्या जी परिस्थिती आहे, त्याकडे कोणीही दुर्लक्ष करून चालणार नाही.देशविघातक कृत्य करणाऱ्या कोणीही या गर्दीचा गैरफायदा घेऊ नये. अन्यथा कडक कारवाई करणार असल्याचं ते म्हणाले.
यासोबत नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ते म्हणाले, की सभेतील भाषणं योग्य भाषेत होणं अपेक्षित आहे. भाषण हे खुसखुशीतही करता येतं. कोणाची अवमानकारक वक्तव्य त्यात नसावीत. काही चुकीची वक्तव्य झाली तर कायदा त्याचं काम करणार आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. नाना पटोले यांनी चित्त्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, की चित्ता कुठून आलेत, हेही नाना पटोलेंना नीट माहिती नाही.