महाराष्ट्रात २९, ३० नोव्हेंबर पावसाची शक्यता हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी !
मुंबई : ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान महाराष्ट्रात थंडीचे आगमन होते. पण सद्यस्थितीत राज्यात तापमानाच्या पाऱ्याने पस्तीशी गाठल्याचे दिसते आहे. पण कोकण, मध्य व दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच, राज्यातील काही भागात जोरदार वारे वाहू शकतात असे हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. Rain forecast for Maharashtra on November 29, 30
सोमवार २९ नोव्हेंबर रोजी राज्यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या मध्य महाराष्ट्रासह कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या भागात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर, मंगळवारी ३० नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागात यलो अलर्ट जारी नसला तरी, पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
राज्यात 29, 30 नोव्हेंबरला कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची व जोरदार वाऱ्यांची शक्यता.
काही ठिकाणी हलका पाऊस.
– IMD @RMC_Mumbai pic.twitter.com/7kJrSx05MR— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 26, 2021
अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे याचा परिणाम राज्याच्या तापमानावर झाला आहे. हलक्या थंडीची चाहूल दूर होऊन राज्यातील तापमान वाढले आहे. तर, कोकणातील काही भागात पावसाची सुरूवात झाली होती. हवामान खात्याने येत्या २९ व ३० तारखेला मुंबईत पावसाची शक्यता वर्तवली आहे.