बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली, यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी. मविआचे सरकार अशा बाबतीत तातडीने मदत करीत होते.
सत्ता ओरबाडून घेतली मात्र कामाची सुरुवात होताना दिसत नाही..अडीच महिने झालं सरकार बदललं पण अजून पालकमंत्री नाहीये. मी मुख्यमंत्री यांना विनंती करते जस एका दिवसात 20 मंडळाच्या गणपतीला गेलात तसा एक दिवस आम्हाला द्या. आम्ही 20 गावात त्यांना नेतो. महाराष्ट्रात आता 2 मुख्यमंत्री हवे आहेत. एक मंडळात जातील आणि दुसरे मुख्यमंत्री मंत्रालयात बसून शेतकऱ्यांना, नागरिकांना मदत करतील, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
निर्मला सितारमण यांचा बारामती दौरा निर्मला सितारमण या बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत, त्यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. निर्मला सितारमण यांनी शेतकऱ्यांना दोन हजार कोटींचं पॅकेज जाहीर करावं. त्यांच्यासाठी हजार-दोन हजार कोटी जास्त नाहीत, किरकोळ आहेत. पाच-दहा कोटींचं पॅकेज त्यांनी बारामती मतदारसंघाला द्यावं, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली