शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा बंड इतिहासात कायम आठवणीत ठेवला जाईल, कारण या बंडामुळे आज महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. शिंदे गटात शिवसेना नेत्यांनी शामिल होण्याचा निर्णय घेत मविआचा पाठींबा काढून घेतला. शिंदे गटात बच्चू कडू यांचाही समावेश होता. काल फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत आपले मुख्यमंत्री पद सोडले. मात्र यात बच्चू कडू यांच्याबद्दल लॉजिक म्हणावं की मॅजिक असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने तीन रस्त्यांच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर होता. तसेच तक्रार सुद्धा दाखल केली होती या प्रकरणातून आता बच्चू कडू यांची निर्दोष मुक्तता झाली असून बच्चू कडू यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याने पोलिसांनी या प्रकरणाची फाईल बंद केली आहे.
सदरील तीन रस्त्यांच्या कामात तब्बल एक कोटी ९५ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर होता. सिटी कोतवाली पोलिसात बच्चू कडू यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. मात्र पुरावे सापडले नसल्याने ही फाईल बंद करण्यात आली आहे. तिकडे मविआ सरकार कोसळले आणि इकडे बच्चू कडू यांची फाईल बंद झाली, त्यामुळे अनेक चर्चा सध्या राजकारणात रंगत आहेत.