राज्यात गेल्या 22 दिवसांपासून लोडशेडिंग नाही. यापुढेही पुढेही लोडशेडिंग होणार नाही, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोळसा टंचामुळे लोडशेडिंगचा सामना करावा लागत होता. परंतु, यापुढे कोळशाची कमतरता भासणार नाही आणि महानिर्मितीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे गेल्या 22 दिवसांपासून लोडशेडिंग नाही आणि पुढेही होणार नाही, अशी माहिती नितीन राऊत यानी दिली आहे.
“शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असे प्लॅन केले आहेत. केंद्राने कोळशाचे नियोजन व्यवस्थित केले नाही. मालगाड्या सुरू केल्या तरी व्यवस्थित पुरवठा होत नाही. देशातील इतर 12-13 राज्यात लोडशेडिंग आहे. परंतु, महाराष्ट्रात आता लोडशेडिंग नाही ही कौतुकास्पद गोष्ट आहे, असे मत नितीन राऊत यांनी व्यक्त केले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डहाळेवाडी गावात विद्युत उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. यावेळी नितीन राऊत बोलत होते.
दरम्यान, काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना अचानक मंत्रालयाची लाईट गेली होती. यावर बोलताना नितीन राऊत म्हणाले, मुंबई किंवा मंत्रालय या ठिकाणी महावितरण काम करत नाही. तेथे टाटा, बेस्ट आणि अदानी या कंपन्या काम करतात. मंत्रालयाचा परिसर बेस्टमध्ये येते. आमच्या नियंत्रणाखाली तो भाग येत नसल्यामुळे आम्ही त्याची चौकशी करू शकत नाही.