नवी दिल्ली | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पराभवांनंतर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे तसेच आता मोठया प्रमाणात पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांच्या संख्येत सुद्धा वाढ झालेली दिसून येत आहे. अशातच आताभाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस संदर्भात सकारत्मक विधान केले आहे आता या विधानाची सर्वत्र जोरदार चारचा होताना दिसून येत आहे.
सलग निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी आणि पक्षाच्या नेत्यांनी निराश होऊन पक्ष सोडू नये हीच आपली इच्छा आहे, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केल्याने ‘काँग्रेसमुक्त हिंदुस्थान’ची घोषणा करणाऱ्या भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी हे विधान केले आहे.
जवाहरलाल नेहरू हे एक उदाहरण आहे. अटलबिहारी वाजपेयी लोकसभा निवडणुकीत हरले तेव्हाही नेहरूंनी त्यांचा आदर केला. काँग्रेस मजबूत राहावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. जे काँग्रेसच्या विचारसरणीचे पालन करतात त्यांनी पक्षासोबत राहून खंबीर राहावे, असेही काँग्रेस नेत्यांना नितीन गडकरी म्हणाले. लोकशाही दोन चाकांवर चालते. एक सत्ताधारी आणि दुसरा विरोधक. प्रबळ विरोध ही लोकशाहीची गरज आहे. त्यामुळे काँग्रेस मजबूत असावी हीच माझी इच्छा आहे. त्याचवेळी काँग्रेस कमकुवत असताना त्याचे स्थान प्रादेशिक पक्ष घेत आहेत. हे लोकशाहीसाठी चांगले नाही, असेही नितीन गडकरी म्हणाले.