सांगली : महापालिका क्षेत्रातील जनतेने भाजपला बहुमताने सत्ता दिली, पण त्यांची सत्ता जनतेच्या उपयोगी नव्हती.त्यामुळेच काँग्रेस व भाजपमधील सुजाण नगरसेवकांमुळे आघाडीची सत्ता आली, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. प्रभाग १६ ची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. पण भाजपमुळेच त्याला खो बसल्याचा आरोपही केला.
पाटील म्हणाले की, हारुण शिकलगार यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली. मदनभाऊ पाटील यांनाही कायम साथ दिली होती. ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. पण सतत राजकीय विचार करणाऱ्यांमुळे बिनविरोध झाली नाही.महापालिकेत आघाडीची सत्ता आल्यापासून नवे उपक्रम राबविले जात आहेत.
तसेच नवीन रस्ते, रुग्णालयांच्या सुधारणा होत आहेत. तौफिक याच्यारूपाने तरुण कार्यकर्त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्याच्या विजयासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही कार्यरत आहेत. काँग्रेसमुळेच राष्ट्रवादीचा महापौर झाला, हे विसरता येणार नाही. या प्रभागाच्या विकासासाठी सर्व नेते, महापौर लक्ष देतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.