महाराष्ट्राचा वारंवार अपमान केला जात असून याबाबत सर्व स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे. कर्नाटक सरकार महाराष्ट्रावर मुजोरी करतोय, पण महाराष्ट्रातलं सरकार मूग गिळून बसले. यामागे लोक म्हणतात तसं नक्की काहीतरी गूढ आहे. त्या अदृश्य हातांना सरकारबद्दल असं काही तरी माहिती आहे, त्यामुळेच सरकार शांत आहे. कोणती तडजोड करून हे सरकार आलंय, हे अदृश्य हातांना माहिती असावं, अशा शब्दात राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.
महाविकास आघाडी सरकारने शिंदे-भाजप सरकारविरोधात काढलेल्या मोर्चात आज खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाल्या. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या लोकांवर भाजपा किंवा महाराष्ट्र सरकार कारवाई का करत नाही, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजपची एक संस्कृती होती. यापूर्वीच्या नेत्यांची भाषणं ऐकण्यासारखी असत. प्रमोदजी, सुषमाजी, अरुणजी यांची भाषणं आम्ही आवर्जून ऐकायचो. ते उत्तम वक्ते होते, असेही सुळे म्हणाल्या.
ज्या पद्धतीने ते मुद्दे मांडायचे. तेव्हा आपलंही भाषण कधीतरी असावं, असं आमच्या मनात यायचं… पण ज्या पक्षाला एवढी शिस्त होती. त्या पक्षाला काय झालंय माहिती नाही. सुसंस्कृत होता, तसा राहिलेला नाही. सत्ता येते जाते. राज्याची आणि देशाची संस्कृती राहिली पाहिजे. तशी आज राहिलेली नाही, अशा शब्दात सुळे यांनी खंत व्यक्त केली.
केंद्रातील भाजप सरकार राज्यपालांविरोधात कारवाई का करत नाही? असा प्रश्न सुळे यांना विचारण्यात आला. यामागे अदृश्य हात आहे. त्यांना महाराष्ट्राला कमी दाखवायचा, असे उत्तर त्यांनी दिले. हापुरुषांचा अपमान होतो तरीही सरकार अशा लोकांची पाठराखण करते. सीमाप्रश्नावरही चुप्पी साधली जाते. गुंतवणूक दुसऱ्या राज्यात गेल्या.कदाचित हे सरकार तडजोड करून आले आहे,अशी टीकाही सुळे यांनी केली.