जाणून घ्या : तुला कवडीचीही किंमत नाही असे बोलले जाणाऱ्या कवडीची किंमत

.
नवीन काहीतरी: जाणून घ्या कवडीची किंमत

एकेकाळी चलनवलनासह दागिने, देव्हाऱ्यातही आवर्जून असणारी कवडी सध्या दुर्मिळ झाली आहे. पूर्वी वस्तू विनिमय पद्धत होती. चलन उदयास येण्यापूर्वी सर्व व्यवहार (एक्सचेंज) बार्टरच्या रुपात होते. म्हणजे एखाद्याकडे दोन पोते गहू असतील तर ते देऊन त्याने दुसऱ्याकडचे तांदुळ घेणे म्हणजे वस्तू विनिमय. पुढे व्यवहारात चलन आले. मुगल काळापासून म्हणजे इ. स. १५२६ ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे १९४७-४८ पर्यंत कवडीचा चलनात उपयोग होत होता.


कवडी चलनात आल्यानंतर जनजीवनात इतकी रुळली की त्यावरुन वाक्प्रचार आणि म्हणीही तयार झाल्या. तेव्हापासून अत्यंत कंजुस व्यक्तीला कवडी चुंबक संबोधले जाऊ लागले. सगळ्यात कमी मूल्याचे चलन हे फुटकी कवडी होते. त्यानंतर कवडी, दमडी, पै ,ढेला, पैसा, आणा व रुपया अशी चलनाची किंमत वाढत जात होती.

पूर्वी कवड्या आणि चांदी हेच विनिमयाचे साधन होते. नंतर अनेक टांकसाळी अस्तित्वात आल्या. सध्या भारतात मुंबई, अलिपूर(कोलकता), हैद्राबाद आणि नोएडा (दिल्ली) या ठिकाणी टांकसाळ आहेत. विनिमयाचे साधन म्हणून तेव्हा केवळ नाणेच चलनात होते. त्यावरुन “दाम करी काम” हा वाक्प्रचार अस्तित्वात आला.

जाणून घ्या कवडीची किंमत

एका चांगल्या कवडीची किंमत तीन फुटक्या कवड्या होती.दहा चांगल्या कवड्यांची किंमत एक दमडी होती.
चार दमड्यांची किंमत एक पै,
दोन दमड्यांची किंमत एक ढेला,
दोन ढेल्यांची किंमत पैसा अशी होती.
एक रुपयाची किंमत २५६ दमड्या होती.

“पै ना पै चा हिशोब देणे”
‘’खिशात फुटकी कवडी नाही’’
हे वाक्प्रचार तेव्हापासून रूढ झालेले आहेत.

मोगल काळापासून म्हणजे इ. स. १५२६ ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजे १९४७-४८पर्यंत कवडीचा चलनात उपयोग होत होता. सगळ्यात कमी मूल्याचे चलन हे फुटकी कवडी होते. त्यानंतर कवडी, दमडी, पै ,ढेला, पैसा, आणा व रुपया अशी चलनाची किंमत वाढत जात होती. एका चांगल्या कवडीची किंमत तीन फुटक्या कवड्या होती. दहा चांगल्या कवड्यांची किंमत एक दमडी होती. चार दमड्यांची किंमत एक पै, दोन दमड्यांची किंमत एक ढेला, दोन ढेल्यांची किंमत पैसा अशी होती. एक रुपयाची किंमत २५६ दमड्या होती. ‘खिशात फुटकी कवडी नाही’ ही म्हण तेव्हापासून रूढ झालेली आहे. या हिशेबानुसार तेव्हा एक रुपयासाठी तब्बल १०,२४० कवड्या मोजाव्या लागत असत, तर ३० हजार ७२० फुटक्या कवड्या मोजून रुपयाच्या मूल्याची प्रतिपूर्ती होत असे. आता कवडीला होलसेलमध्ये दोन रुपये तर किरकोळ बाजारात पाच रुपये किंमत आहे. यानुसार कवडीने २० हजार ते ५० हजार पट जास्त वाढ नोंदवली असून, तिचे मूल्य आता रुपयाच्या पुढे गेले आहे. यानुसार कवडीला किती महत्त्व आहे, हे अधोरेखित व्हावे.

कवडी येते कुठून?

कवडी ही शंख शिंपल्याबरोबरच समुद्रातून शोधली जाते. गुजरात, गोवा, कोकण आदी समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागातून कवडी मुख्यत: धार्मिक स्थळांवर विकायला येते. साधारण चारशे रुपये किलोप्रमाणे ती सध्या मिळते. एका किलोत आकारानुसार दोनशे ते अडीचशे कवड्या बसतात. रामकुंड, त्र्यंबकेश्वर आदी धार्मिक स्थळी शंख-शिंपल्यांबरोबरच कवड्याच्या माळा विकणारे पथारीवाले असतात. व्यक्तीच्या गरजेनुसार व त्याच्या आर्थिक कुवतीनुसार पाच रुपये ते अगदी काळी कवडी असेल तर ५० रुपयांपर्यंतही ती विकली जाते.

 

शास्त्रीय महत्त्व

शास्त्रीय दृष्ट्या सायप्रिइडी कुलातील सायप्रिया वंशाच्या सागरी गोगलगाईंच्या शंखांना कवडी म्हणतात. कवड्या विविध रंगांच्या, चकचकीत व सुंदर असल्यामुळे शंख-शिंपल्यांचे संग्राहक त्या मौल्यवान मानतात. सारीपाट, चौसर आदी खेळांमध्ये कवड्यांचे महत्त्व होते. म्हणूनच आजही या खेळातील सोंगट्यांना ‘कवड्या’ असेच म्हटले जाते. पूर्वी आफ्रिकेत आणि भारतात कवड्यांचा नाण्यांप्रमाणे उपयोग केला जातअसे. सोन्याला ज्याप्रमाणे गंज लागत नाही, अगदी तसेच कवडीही कायमस्वरुपी गुळगुळीत, चकचकीत आणि एका आकाराची असल्याने तिचा पूर्वापार दागिन्यांमध्ये वापर केला गेला आहे.

धार्मिक क्षेत्रातही आहे कवडीला महत्त्व

मराठी विश्वकोषातील माहितीनुसार दक्षिण भारतात रेणुका, एल्लम्मा, मातंगी, मरीआई, भवानी, महालक्ष्मी इ. नावांनी गाजलेल्या देवींच्या उपासनाक्षेत्रात कवडीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोंधळी, भुत्ये, पोतराज, मातंगी, जोगती, जोगतिणी हे देवीचे उपासकवर्ग आपल्या अंगाखांद्यांवर कवड्यांचे अलंकार परिधान करतात.

 

गोंधळ्यांच्या, भुत्यांच्या, मातंगी-जोगतिणींच्या गळ्यांत कवड्यांच्या माळा असतात; भुत्यांचा शंकाकार टोप बाहेरून कवड्यांनी मढविलेला असतो. ते गळ्यातही कवड्यांच्या माळा घालतात. जोगतिणींच्या ‘जगां’ ना कवड्या गुंफलेल्या असतात. काखेत अडकविलेल्या भंडाराच्या पिशव्यांनाही कवड्या लावलेल्या असतात. मातंगींच्या परड्या कवड्यांनी सजविलेल्या असतात आणि या सर्व उपासकवर्गांच्या कंठातून गळ्यात असलेली देवीप्रतिमा ज्या जाड वस्त्रपटावर जडवलेली असते, तो पटही कवड्या गुंफून शोभिवंत केलेला असतो. प्रत्यक्ष देवालाही कवड्यांचा श्रृंगार प्रिय असल्याची धारणा देवीविषयक लोकगीतांत वारंवार व्यक्त झालेली आहे. तंत्रविद्येतही कवडीला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रातही कवडीला महत्त्वाचे स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा कवड्यांची माळ परिधान करीत असत.

 

विवाहामध्ये कवडीचे स्थान

-आंध्र प्रदेशात विवाहानंतर वधूपित्याला कवडी भेट दिली जाते.

-पंजाबात मुलगी सासरी जाताना तिला कवडी असलेला चरखा भेट देतात.

-ओरिसातही रूखवतात कवड्या दिल्या जातात.

-राजस्थानात विवाहप्रसंगी वधू-वराच्या मस्तकी लोंबतील अशा पद्धतीने कवड्या बांधल्या जातात.

-आसाममध्ये वडिलधारी मंडळी नवदाम्पत्यासमोर कवड्यांचा खुळखुळ आवाज करतात.

-कवड्यांची माळ तुळजापुरात नवरात्रात आवर्जून घेतली जाते.

पुराणात कवडी अनमोल

कवडीविषयी पुराणात एक कथा सांगितली जाते. शिव-पार्वती सारीपाट खेळत असताना देवर्षी नारद आले. त्यांनी पार्वतीच्या हाती कवडी पाहून त्यांनी ‘या कवडीत असे काय आहे की, ज्यामुळे महादेव सतत हारत आहेत’, असा प्रश्न केला. यावर पार्वतीने त्यांच्या हाती कवडी देऊन तिच्या तुलनेत मावेल इतके धन आणण्यास सांगितले. इंद्रदेवाच्या दरबारात तराजू लावला. कुबेराचे संपूर्ण धन ओतले तरी तुळा होईना. शेवटी इंद्रदेवाने मुकुटही त्यात टाकला, तरी तिचे मूल्य झाले नाही. तेव्हापासून कवडीला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले, असे मानतात.

 

 

✍️ संदिपान नामदेवराव कोकाटे
रा. निपाणी ता. भूम

ग्लोबल न्युज नेटवर्क: