देशात महागाई विरोधात आता काँग्रेस आक्रमक झाली असून दिल्लीतील नेत्यांनी थेट मोदी सरकार विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे अशातच आता राज्यात सुद्धा याचे पडसाद आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान घरगुती गॅस सिलेंडर महागला असून सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला आहे. फक्त इतकेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलमध्येही ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. या मुद्द्यावरून आता ३१ मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
यासंदर्भात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असतांना नाना पटोले म्हणाले की,’केंद्र सरकारला जागे करण्यासाठी ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सर्व काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करतील. त्यानंतर २ ते ४ एप्रिल दरम्यान सर्व जिल्हा मुख्यालयात महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चा आयोजित केला आहे.
तद्पश्चात ७ एप्रिलला राज्य मुख्यालयात मुंबईत महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीसारखा भाजपचा कारभार असल्याचेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसिम खान, माजी मंत्री अनिस अहमद, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष एम एम शेख उपस्थित होते.