मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लबोल करून सडकून टीका केली आहे. या अत्याचारी मोदी सरकारची ५ वर्षे संपण्याची वाट देशातील जनता पाहत आहे. २०२४ मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही, अस नाना पटोले यांनी म्हंटल. पटोले यांनी फैजपूर येथे नवीन कृषी कायद्यांची होळी केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
केंद्राने पारित केलेल्या नव्या काळ्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सात महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनात ४०० शेतकऱ्यांचा सापळा प्राण गमवावा लागला आहे. मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी या शेतकऱ्यांची साधी भेटही घेतली नाही. शेतकरी थंडी, पाऊस, उन्हात आंदोलन करत असताना पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये जाऊन प्रचारात व्यस्त होते, असं म्हणत नाना पटोेले यांनी मोदींवर टीका केली आहे.
ओबीसी आरक्षण रद्द होण्यास भाजप सरकार जबाबदार आहे. २०१७ मध्ये हा विषय आल्यावर हेच राज्यातील ओरडणारे विरोधी पक्षातील लोक सत्तेत होते, त्यावेळी त्यांनी लक्ष दिले नाही. केंद्र सरकार ओबीसीची आकडेवारी देत नाही. त्यामुळे न्यायालयाने राज्यातील राजकीय आरक्षण रद्द केले आहे. मात्र आता हा केवळ राज्याचा नव्हे तर देशाचा प्रश्न आहे, असे नाना पटोले म्हणाले तसेच आता या आरक्षणासाठी राज्य सरकार न्यायालयात गेले आहे असेही नाना पटोले यांनी म्हंटल आहे.