मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकयांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले होते. तर दुसरीकडे नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’राज्यातील एक मंत्री इतके दिवस तुरुंगात राहूनसुद्धा त्याचा राजीनामा न घेणं ही लोकशाहीची क्रूर थट्टा आहे. आमच्या पक्षावर जातीचं राजकारण करत असल्याचा आरोप करणारे आज एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी मलिकांचा राजीनामा घेत नाहीत’,असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली. यानंतर मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत ईडीने दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर १६ मार्च रोजी नवाब मलिक यांची ईडीच्या कारवाई विरोधात करण्यात आलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली.