राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णाच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आता पुन्हा एकदा लॉकडाउनच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
एकीकडे राज्यात लसीकरण सुरु झालेले असताना दुसरीकडे मात्र रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभरात राज्यात ४३ हजार १८३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, २४९ जणांनी आपला जीव गमावल्याचे समोर आले आहे. राज्यातील मृत्यू दर १.९२ टक्के आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ३,६६,५३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
तर, काल ३२ हजार ६४१ रुग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २४,३३,३६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८५.२ टक्के एवढे झाले आहे.