मुंबई | रशिया-युक्रेन युद्ध परिस्थिती दरम्यान युक्रेनदेशात अडकलेले महाराष्ट्रातील एकूण ७२ विद्यार्थी आतापर्यंत पाच विशेष विमानांनी दिल्लीत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनाद्वारे स्थापन सहकार्य कक्षाच्या माध्यमातून यातील ४६ विद्यार्थ्यांना सुखरूप स्वगृही पाठविण्यात आले आहेत अशी महती समोर येत आहे.
सद्या युक्रेनमध्ये युध्द सुरु असून तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची भारत सरकारची ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत रविवार मध्यरात्री पासून सोमवारी सायंकाळपर्यंत एकूण पाच विमानांद्वारे जवळपास १२५० भारतीय विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले असून यात महाराष्ट्रातील ७२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
एयर इंडियाच्या विशेष विमानाने बुखारेस्ट (रोमानिया) येथून रविवारी मध्यरात्री दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले विशेष विमान दाखल झाले. यात, महाराष्ट्रातील २८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यानंतर, रविवारी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन विशेष विमानांनी महाराष्ट्रातील प्रत्येकी १८ आणि १२ विद्यार्थी दाखल झाले. सोमवारी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन विशेष विमानांनी प्रत्येकी १० आणि ४ विद्यार्थी दिल्लीत दाखल झाले आहेत.