राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या चिंतेत अधिक भर घालणारी आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.
यापुढे पोलीस कार्यालयात फक्त ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. तसेच इतरांना वर्क फ्रॉम होम’चे आदेश देण्यात आले आहेत. मागच्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच मोठ्या संख्येने ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. याच पाश्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
गट क आणि ड श्रेणीतील पोलीस कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थिती एकूण पदसंख्येच्या ५० टक्के राहील. त्यापैकी २५ टक्के कर्मचारी सकाळी ९ ते ४ या कालावधीत कार्यालयात उपस्थित राहतील, तर उर्वरित २५ टक्के कर्मचारी सकाळी ११ ते ५ या कालावधीत कार्यालयात उपस्थित राहतील.
गट क आणि ड श्रेणीतील उर्वरित पोलीस कर्मचारी हे वर्क फ्रॉम होम करतील. तात्काळ सेवेसाठी फोनवर उपलब्ध असतील. ज्यावेळी कार्यालयीन कामकाजासाठी कार्यालयात तातडीची आवश्यकता असेल, तेव्हा परिस्थिती नुसार कार्यलयात बोलवू शकतात.