मुंबई | साध्वी कांचनगिरी यांनी पुढील १० वर्षात भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ शकते असे मत व्यक्त केले आहे. तसेच त्यावेळी हिंदूंना भारतात शरणार्थी व्हावं लागेल, असा दावा केला आहे. त्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबईतील कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी हिंदू राष्ट्रासाठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे असे आवाहनही केले आहे.
कांचनगिरी म्हणाल्या, ‘अफगाणिस्तानचे काय हाल झालेत हे सर्वजण पाहत आहेत. पुढील १० वर्षात भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ शकते. हिंदूस्थान त्या धोक्याच्या किनाऱ्यावर आहे. १० वर्षांनंतर हिंदूंना शरणार्थी बनावं लागेल. आज हिंदू जागे झाले नाही तर कधीच जागे होणार नाही.’
‘काश्मीर आज नाही तर खूप आधीपासून जळत आहे. हे सर्व नेहरू आणि गांधीजींमुळे झालंय. पाकिस्तानला वेगळं केलं नसतं, तर काश्मीर का जळालं असतं? मग का फाळणी करण्यात आली. अफगाणिस्तान देखील आपलंच होतं. त्याला कंधारच्या नावानं ओळखलं जातं,’ असेही त्यांनी नमूद केले. कांचनगिरी म्हणाल्या, ‘जुना इतिहास आहे की संतांनी राज्यांचं नेतृत्व केले आहे. चंद्रगुप्त मौर्या यांचं उदाहरण पाहू शकता. त्यांना चाणाक्याने मार्ग दाखवला. त्यानंतर ते यशस्वी राजा बनले. हे संतांचं कामच आहे की राजकीय नेत्यांना मार्गदर्शन करणं.’
माझा राजकारणाशी संबंध नाही. जे खरे राष्ट्रवादी राजकीय नेते आहेत त्यांच्या नेतृत्वात राहू. पण सध्या पदाबाबत कोणताही विचार नाही,’ असेही कांचनगिरी यांनी सांगितले. कांचनगिरी म्हणाल्या, ‘राज ठाकरेंचं उत्तर भारतीयांवर खूप प्रेम आहे. त्याचं म्हणणं आहे की बिहारमधील गावांमधून लोकांचं पलायन होतंय. तिथंच कंपन्या सुरू झाल्या तर लोकांना गावातच रोजगार मिळू शकतील. त्यांना घर सोडून जावं लागणार नाही. त्यांच्या याच भूमिकेला लोकांनी चुकीचं घेतलं. ते जितकं प्रेम महाराष्ट्रातील लोकांवर करतात तितकंच प्रेम उत्तर भारतीय लोकांवर करतात.’