भाजपच्या नवनिर्वाचित चार नव्या केंद्रीय मंत्र्यांकडून भाजपकडून संपूर्ण महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये अनेक भागात नव्यानं झालेले केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या यात्रेचं नियोजन केले. लोकांशी संवाद साधण्यासोबतच केंद्रातील योजनांची माहिती देखील ते जनतेला देणार आहेत. भाजपच्या वतीने देशभर हा कार्यक्रम आखला गेला आहे. महाराष्ट्रासह २२ राज्यांमध्येही यात्रा निघणार आहे.
तब्बल १९ हजार ५६७ किमी प्रवास केंद्रीय मंत्री करणार आहे. यामध्ये आपापल्या मतदार संघात न जाता इतर जिल्ह्यात मोदींच्या मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेले नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड हे नेते महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत.
मात्र आता भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. पेट्रोलची डबल सेंच्युरी करण्यासाठीच ही जन आशीर्वाद यात्रा आहे का ? अशा शब्दात नाना पटोले यांनी या जन आशीर्वाद यात्रेची फिरकी घेतली आहे. तसेच जनता भाजपला घरी पाठवण्याचाच आशीर्वाद देईल, असा खोचक टोलाही पटोले यांनी लगावला आहे.