नवी दिल्ली | दलीतांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत असल्याने राजस्थानमधील सरकार बरखासत करावे अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी राष्ट्र्रपतींकडे केली आहे. या संदर्भात माजी मुख्यमंत्री मायावती यांनी सूचक ट्विट केले आहे. मायावती यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राजस्थानातील कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात दलीत आणि आदिवासींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. धौलपूर आणि डीडवाना येथे दोन दलीत युवतींवर बलात्कार झाला होता.
अलवर येथे एका दलीत युवकाची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या करण्यात आली. जोधपूर जिल्ह्यातील पाली येथे एका दलीत युवकाची हत्या करण्यात आली. यामुळे दलीत समाजात संताप आहे. यातून स्पष्ट दिसत आहे की राजस्थानात दलीत आणि आदिवासींना सुरक्षा देण्यात कॉँग्रेस सरकार पूर्णपणे अपयशी ठरली आहे.
त्यामुळे हे सरकार बरखास्त करून याठिकाणी राष्ट्र्रपती राजवट लावणेच योग्य होईल.राजस्थानातील धौलपूर येथे एक महिला आपल्या पतीसोबत शेतातून परतत होते. त्यावेळी काही लोकांनी पतीला मारहाण केली. महिलेवर तिच्या दोन लहान मुलांसमोरच बलात्कार केला. मात्र, पोलीसांनी दावा केला आहे की या महिलेवर बलात्कार झालेला नाही तर फक्त मारहाण झाली आहे.