पश्चिम बंगाल | पश्चिम बंगालमध्ये विधानसभा आणि पोट निवडणूक पार पडल्यानंतर सुद्धा स्थानिक वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. त्यातच पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणात सुरु झालेला हिंसाचार अद्यापही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजप नेत्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी ट्विट करून यामागे तृणमूल काँग्रेस असल्याचा आरोप केला आहे.
भाजप युवा मार्चाचे नेते मिथुन घोष यांची उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इटाहार येथे अज्ञात हल्लेखोरांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मिथुन घोष ३२ वर्षांचे होते. यानंतर भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी एक ट्विट करत यामागे तृणमूल काँग्रेस असून, पश्चिम बंगालमधील हिंसाचारालाही जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
सुवेंदू अधिकारी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, भाजप युवा मोर्चाचे नेते मिथुन घोष यांची इटाहार येथे गोळी झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमागे टीएमसीचा हात आहे. असामाजिक तत्वांनी आपल्या मालकाच्या आदेशावरून ही हत्या घडवून आणली आहे. मिथुन घोष यांचे योगदान भाजप कधीही विसरणार नाही. योग्य वेळ आली की, याला योग्य प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा सुवेंदू अधिकारी यांनी दिला.