औरंगाबाद |मंगळवार पासून शहरात पडणाऱ्या रिमझिम पावसाने शहरात हजेरी लावली होती. मात्र सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. एक तास झालेल्या पावसाने शहराला झोडपून काढले. शहरातील नाले भरून वाहू लागले. वस्त्या वस्त्यांमध्ये, रस्त्या-रस्त्यांवर पाणीच पाणी झाले. अनेक भागांतील घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी वाहने पाण्यात बुडाली. अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.
मागच्या अनेक दिवसापासुंन उघडलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. शहरात चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. बैलपोळा सणालाही पावसाने हजेरी लावत बैलांचे शिंग भिजवले. त्यामुळे बळीराजाही सुखावला. आज मंगळवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली.
शहराच्या काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दुपारी पावसाने विश्रांती चेतली असली तरी रात्री सात वाजेच्या सुमारास मात्र शहराला धुवाधार पावसाने झोडपून काढले. एक तास कोसळलेल्या पावसामुळे नाले भरून वाहू लागले. सखल भागात पाणीच पाणी झाले. नाल्यांच्या काठावरील आणि सखल भागांतील वसाहतींमधील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार पाण्यात बुडाले. त्यासोबतच अनेकांच्या पार्किंगसह तळमजल्यातील दुकानांमध्ये पाणी पाणी झाले. त्यामुळे नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली. भरपावसात पाणी काढण्यासाठी दमछाक झाली. सुखना आणि खाम नदी दुथडी भरून वाहत होती.