मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईला २४ तास उलटं नाही तोवर शिवसेना नेते आणि स्थानी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून टीका करण्यात आलेली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे शिखंडींच्या हातातील हत्यारे झाली आहेत व देशाला त्यापासून धोका आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याची बदनामी करण्यासाठी हे शिखंडी अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचले आहेत, पण या शिखंडींच्याही कमरेला धोतर आहे व त्याचीही गाठ सुटू शकते हे त्यांनी विसरू नये.
विरोधात बोलणाऱ्यांचे संबंध दाऊदशी जोडायचे, मनी लॉण्डरिंगची खोटी प्रकरणे बनवायची, त्यांची यथेच्छ बदनामी करायची हेच सुरू आहे. कारण हे करणाऱ्यांच्या मनगटात ताकद नाही, दंडावरील बेडक्यांत जोर नाही. शिखंडीला पुढे करून युद्ध करायचे. हिंमत असेल तर निधडय़ा छातीने पुढे या. आहे हिंमत? असं आव्हान शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपाला दिलं आहे.
तसेच किरीट सोमय्या, नील सोमय्या, प्रसाद लाड, पुण्याचे मोहोळ, गिरीश महाजन, मुनगंटीवारांचा ‘झाड’ घोटाळा, अमोल काळे, विजय ढवंगाळे यांचा महापोर्टल आयटी घोटाळा, अगदी चंद्रकांत पाटलांनी सार्वजनिक बांधकाम, महसूलमंत्री म्हणून केलेले उद्योग कोणत्या ‘डर्टी डझन’मध्ये बसतात ते लवकरच कळेल. पोलीस भरती घोटाळाही रटरटून शिजलाच आहे. आता सुरुवात झालीच आहे तर तुमचेही ‘डर्टी बारा’चे बारा वाजल्याशिवाय राहणार नाहीत. दरेकरांनी तर मुंबै बँक लुटून फस्त केली. त्यामुळे तिथेही तेरावे उरकावेच लागेल असंही शिवसेनेने म्हटलं आहे.
सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
भारतीय जनता पक्षाने म्हणे भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारले आहे. रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे हे सगळय़ांना माहीत आहे, पण भाजपनेही युद्ध पुकारले आहे. तेही भ्रष्टाचाराविरुद्ध! केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईस हे लोक युद्ध वगैरे म्हणत असतील तर ते मूर्खपणाचे लक्षण आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या ‘आड’ लपून हे लोक युद्धाचा आव आणीत आहेत. हा शिखंडी प्रयोग आहे. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांचे पथक पोहोचले. त्यांना जो तपास करायचा तो करतील
पण भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्यांना एक आठवण करून द्यायची आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजप स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना महापालिकेतच लाखो रुपयांची लाच स्वीकारताना अटक झाली व आठवडाभर जेल भोगून ते पुन्हा स्थायी समितीचा पुढला भ्रष्टाचार करण्यासाठी रुजू झाले. यावर भाजपवाले तोंड का उचकटत नाहीत?
पुण्याचे महापौर मोहोळ यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा थक्क करणाऱ्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड मनपातील स्मार्ट सिटी घोटाळा ही जनतेच्या पैशांची लूट असून भाजपचेच लोक त्या लुटीचे भागीदार आहेत. नागपूर महापालिकाही या कामी मागे नाही. त्यामुळे भाजपच्या भ्रष्टाचारविरोधी युद्धात पुणे, पिंपरी-चिंचवड मनपातील घोटाळय़ांचा समावेश आहे काय?