महाविकास आघाडीचे २५ आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा करत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला होता. दानवेंच्या या दाव्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याही आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर भाजपाचे ५० आमदार आमच्या संपर्कात असल्याचा प्रतिदावा केला आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराज आमदारांना स्पष्ट इशारा दिला आहे.
मंत्री जयंत पाटील म्हणाले की, आमचे आमदार फुटणे शक्य नाही. जर फुटला तर तो परत विधानसभेत दिसणार नाही. लोकंच सळो की पळो करून सोडतील. अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी भाजपच्या आमदारांना मोठा निधी दिला. फडणवीस यांनी जितका निधी दिला त्याच्यापेक्षा जास्त निधी आम्ही दिला आहे तसे फोन करुन भाजप आमदार आम्हाला सांगत आहेत. त्यामुळे आमचे आमदार फुटणे शक्य नाही. जर फुटला तर तो परत विधानसभेत दिसणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
पुढे पाटील म्हणाले की, भाजपला पंचाईत ही आहे की त्यांचे आमदार त्यांच्यासोबत राहतील याची काहीच त्याना शाश्वती नाही. त्यामुळे त्यांची पंचाईत झाल्याने भीती दाखवणे सूरु आहेत. आमचे २५ आमदार बाहेर पडणार आहेत मग आम्ही काय वेडे आहोत का? पुन्हा एक माणूस आम्ही परत निवडून येऊ देणार नाही. एवढं सोप्प नाही राजीनामा द्यायचं आणि बाहेर पडायचं. जो महाविकास आघाडीतून बाहेर पडेल त्याला लोकं सळो की पळो करून टाकतील. ते लोकांना काय सांगणार त्यामुळे अशी कुठलीही घटना घडणार नाही