मुंबई | काश्मीर हा आपल्या देशासाठी आणि देशाच्या जनतेसाठी अत्यंत संवेदनशील असा विषय आहे. अनेक वर्ष देशात राजकारण सुरू आहे, आम्हाला वाटले होते, नरेंद्र मोदी आल्यानंतर ते थांबेल, पण ते वाढतच चालले आहे. कश्मीर फाइल्स मध्ये अनेक गोष्टी अशा आहेत, ज्या असत्य आहेत, ज्या घडलेल्या नाहीत. पण तो चित्रपट आहे, ज्यांना पाहायचा आहे ते पाहतील आणि ज्यांना खटकलं असेल ते बोलतील. असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, शिवसेना कधीही हिंदुत्व विसरणार नाही आणि विसरलेली नाही. हिंदुत्व कोण विसरले याचे आत्मचिंतन भाजपने करायला हवे. हिंदुत्ववादी शिवसेनेला दगा कोणी दिला त्याचे चिंतन त्यांनीच केले पाहिजे. आम्ही आमच्या हिंदुत्वाशी पक्के आहोत आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा हिंदुत्वासाठी हातात तलवार घ्यायला आम्ही तयार आहोत. असे संजय राऊत यांनी म्अहटले आहे.
दरम्यान देशभरात सध्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटवरून राजकारण चांगलेच पेटले असल्याचे दिसून येत आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष रंगताना दिसून येत आहे. यावर अनेक राजकीय प्र्तिक्रिया देखील उमटत आहेत. तसेच भाजपने या चित्रपटावरून काँग्रेसला निशाण्यावर धरत टीकास्त्र सोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हा चित्रपट बघितला असून त्यांनीही याची तारीफ केली आहे.