पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेकांचा संसार या पाण्यात वाहून गेला होता. तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकणांना आपला प्राणही गमवावा लागला होता, याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळावी अशी मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
ते म्हणाले की, केंद्र सरकारने दिलेली मदत तुटपुंजी आहे. राज्याला भरीव मदत मिळाली पाहिजे. केंद्र आणि राज्य असा भेदभाव न करता मदत मिळाली पाहिजे, असं सांगतानाच केंद्र सरकारने मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्यावी, असं आवाहन मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
कोकणात महापुरानं मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी रोगराई पसरण्याची भीती आहे. त्यामुळे आम्ही आज कँम्प राबवतोय. राज्य सरकारने पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीआरएफच्या निकषांच्या बाहेर जाऊन मदत करण्यात येत आहे, असं सांगतानाच पंचनामे झाल्यावर येत्या दोन दिवसात पॅकेज जाहीर केलं जाईल. पॅकेज जाहीर करणं अत्यंत आवश्यक आहे, असं शिंदे यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातदेखील पूरग्रस्त गावांत शिवसेनेची आरोग्य शिबीरे सुरू करण्यात आली आहेत. यासाठी ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे मोफत फिरता दवाखाना शिरोळ तालुक्यातील नरसोबाची वाडी, जैनापूर येथे दाखल झाला असून आरोग्य शिबिरांना सुरुवात झाली आहे. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, ठाण्याताली डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन शिरोळ यांच्या वतीने शिरोळ तालुक्यामधील निवारा छावणीवर असलेल्या पूर बाधीतांसाठी गुरुवारी व शुक्रवारी आरोग्य तपासणी व औषधाचे वाटप करण्यात आले.