राज्यातील सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांनी अमित शाहांची भेट घेतली. यानंतर दोघंही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. याआधी दिल्लीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेशी संवाद साधला. वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी दौरा होता, असं त्यांनी स्पष्ट केलं.
आम्ही लोकांच्या मनातील सरकार स्थापना केलं. या सरकार स्थापनेत फडणवीसांचं मोठं योगदान आहे. नड्डा साहेबही संपर्कात होते. सेना भाजपने युतीत निवडणूक लढवली. त्यामुळे हे लोकांच्या मनातील सरकार आहे. राज्याच्या विकासात केंद्राचा मोठा वाटा आहे. आम्ही गद्दारी केली नाही, तर आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं की अन्याय सहन करायचा नाही, असं शिंदे म्हणाले.
उद्या आषाढी एकादशी झाली की मी आणि देवेंद्र फडणवीस मुंबईत भेटून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करु. त्यानंतर आपल्या मनातील प्रश्नाचं उत्तर लवकरच देऊ. अधिवेशनाआधी मंत्र्यांचा शपथविधी होईल, असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. राज्यात एका विचारातून या सगळ्या घडामोड झाल्या आहेत. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या सदिच्छा भेटी होत्या. हा राजकिय दौरा नाही. लोकांच्या मनात होतं तसं सरकार राज्यात स्थापन झालं आहे. वरिष्ठ नेत्यांच्या सदिच्छा भेटीला आम्ही कालपासून आलो आहोत, असंही त्यांनी सांगितलं