राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे स्वतः कोरोना विरुध्दची लढाई लढत आहेत. कोरोनाची लागण झाल्याने गेल्या चार दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशातच मुंबई-पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. राज्य सरकार सतर्क असतानाच राजेश टोपे यांनी रुग्णालयातून राज्यातील जनतेला मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन टाळा, असे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटाची शक्यता असतांना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातून राज्यातील जनतेला भावनिक पत्र लिहून साद घातली आहे.
आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात, गेल्या वर्षभरापासून आपण कोरोनाविरुध्दची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना आणि प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोना योध्दे, विशेषतः डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करु शकलो. मात्र, अद्यापही कोरोना गेलेला नाही. तो पुन्हा डोकं वर काढतोय. तेंव्हा पुन्हा एकदा सामूहिक लढाई लढावी लागणार आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) February 22, 2021
`समजदार, संवेदनशील व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा अत्यंत संयमाने सामना केलेला आपण पाहिला. मात्र आता पुन्हा लॉकडाऊन परवडणार नाही. लॉकडाऊन टाळणं केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. तेंव्हा आपणास माझे कळकळीचे आवाहन राहिल की, मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन टाळा, असे भावनिक आवाहन टोपे यांनी केले आहे.